India Morning News
मुख्यमंत्री चालत येऊ शकत नाही का? पुरग्रस्त तरुणीचा संताप सोलापूरात
सोलापूर (24 सप्टेंबर 2025): मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरणातून अचानक पाणी सोडल्याने शेकडो कुटुंबे उध्वस्त झाली, घरे आणि शेतमळे पाण्याखाली गेले. मात्र प्रशासन वेळेवर पोहोचले नाही, यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे.
हेलिकॉप्टरसाठी प्रशासनाची धावपळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी येणार असल्याने प्रशासनाने अचानक तयारी सुरू केली. हेलिकॉप्टरसाठी मैदान तयार करणे, रस्ते साफ करणे, व्यवस्था लावणे—या सर्व गोष्टींनी लोकांमध्ये प्रश्न निर्माण केले.
पुरग्रस्त तरुणीचा संताप
एका संतप्त तरुणीने माध्यमांसमोर थेट मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली:
“कालपासून आम्ही पाण्यात अडकलो आहोत. कोणी मदतीला आलं नाही. काल हेलिकॉप्टर आलं, पण फक्त दोन जणांना घेऊन निघून गेलं. बाकी शेकडो लोकांचं काय? आज मुख्यमंत्री येणार म्हणून एवढी व्यवस्था होतेय. कशाला हवंय हेलिकॉप्टर, पायांनी यावं ना लोकांसारखं!”
प्रशासनावर लोकांचा सवाल
स्थानिक तरुणांनीही प्रशासनावर ताशेरे ओढले.
“उन्हाळ्यात पाण्यासाठी तहानलेले असतो, तेव्हा धरणातून पाणी सोडत नाहीत. पण पावसाळ्यात अचानक पाणी सोडून आमची घरे बुडवतात. आमच्या संसाराचं काय?”
पूरग्रस्तांचे अपेक्षित दिलासे
पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना आता मुख्यमंत्री काय दिलासा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक नागरिकांना आर्थिक मदत, पुनर्वसन आणि तातडीची मदत त्वरित मिळावी अशी अपेक्षा आहे.











Comments are closed