India Morning News
पंढरपूर:-आषाढी शुध्द एकादशीचा सोहळा ६ जुलै २०२५ रोजी होणार असून, यानिमित्ताने राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत. या सोहळ्यासाठी वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने केलेल्या तयारीची पाहणी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केली.
पालखी तळ, भक्ती सागर, वाळवंटाची पाहणी
विभागीय आयुक्तांनी पालखी तळ, भक्ती सागर (६५ एकर), चंद्रभागा वाळवंट येथील वारकऱ्यांसाठीच्या सुविधांची पाहणी केली. यामध्ये शौचालय, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था यांचा समावेश आहे. तसेच, मंदिर समितीने पत्रा शेड आणि दर्शन रांगेत केलेल्या सुविधांचीही तपासणी करण्यात आली. नवीन बसस्थानकाजवळ पोलिस प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दी व्यवस्थापनासाठी उभारलेल्या एकात्मिक नियंत्रण प्रणालीच्या ठिकाणाचीही पाहणी करून आयुक्तांनी आवश्यक सूचना दिल्या.
प्रशासन आणि मंदिर समितीकडून माहिती
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीने केलेल्या सुविधांसह श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन-संवर्धन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती सादर केली. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नगरपालिका प्रशासनाकडून ६५ एकर, वाळवंट आणि शहरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा, अतिक्रमण निर्मूलन मोहीम, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रकाश व्यवस्था याबाबत माहिती दिली.






Comments are closed