India Morning News
मुंबई: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मांग, मातंग आणि इतर घटक समाजाला आरक्षणाचे वर्गीकरण करून न्याय मिळावा, यासाठी लाखोंच्या संख्येने समाजबांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर तेलंगणा आणि कर्नाटकात याची अंमलबजावणी सुरू झाली असताना, महाराष्ट्रात मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मातंग समाजाने हा मोर्चा काढला. यावेळी आमदार अमित गोरखे यांनी, “मातंग समाज पहिल्यापासून महायुतीसोबत आहे,” असे आमदार अमित गोरखे ठामपणे सांगितले.
महसूलमंत्र्यांचे आश्वासन
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, “मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसंदर्भात येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी याची पूर्ण जबाबदारी घेतो.” त्यांच्या या आश्वासनाला उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.
या मोर्चात आमदार अमित गोरखे, सुनील कांबळे, जितेश अंतापुरकर, हेमंत ओगले, माजी मंत्री रमेश बागवे, लक्ष्मण ढोबळे, दिलीप कांबळे, माजी आमदार अविनाश घाटे, सुधाकर भालेराव, राजू आवळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंद गुंडले, विष्णूभाऊ कसबे, ॲड. राम चव्हाण, मारुती वाडेकर, सुधार धूपे, पंडित सूर्यवंशी, मुखेडकर यांच्यासह अनेक समाजनेते उपस्थित होते.

लाखोंचा जनसागर
सकल मातंग समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आझाद मैदानात एक लाखांहून अधिक समाजबांधवांनी हजेरी लावली. या भव्य मोर्चाने सरकारवर आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी दबाव वाढवला आहे. आगामी काळात याबाबत सरकार काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











Comments are closed