India Morning News
नागपूर : पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या थरारक हल्ल्याने देश पुन्हा हादरला आहे. महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून, त्यातील दोन जण पुण्याचे होते. कौस्तुभ गणबोटे व त्यांचा मित्र संतोष जगदाळे यांचा मृत्यू त्यांच्या परिवारासमोरच झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज सकाळी गणबोटे कुटुंबियांना भेट दिली. त्यावेळी कौस्तुभ यांच्या पत्नीने घटनेच्या वेळी घडलेला अंगावर शहारा आणणारा अनुभव कथन केला. आम्ही पहलगाममध्ये होतो. अचानक गोळीबार सुरू झाला. दहशतवाद्यांनी अजान म्हणायला सांगितलं, त्यावर आम्ही सगळ्या महिलांनी अजान म्हणायला सुरुवात केली. तरीसुद्धा त्यांनी पुरुषांवर गोळ्या झाडल्या, असे त्या सांगत होत्या.
टिकल्या उतरवून, आम्ही अल्लाहू अकबर म्हणत होतो
गणबोटे यांच्या पत्नी म्हणाल्या, “माझे नवरे आणि त्यांचे मित्र एकत्र उभे होते. अतिरेक्यांनी विचारलं ‘अजान वाचता येतं का?’ आम्ही भीतीपोटी टिकल्या काढून टाकल्या आणि अल्लाहू अकबर म्हणायला सुरुवात केली. तरीही त्यांनी कोणतीही दया न दाखवता आमच्यासमोरच सर्वांना गोळ्या घातल्या.”
त्या पुढे म्हणाल्या, “तिथेच एक मुस्लिम तरुण होता. त्याने अतिरेक्यांना विचारलं, ‘का मारताय हे लोक? त्यांनी काही केलंय का?’ त्यालाही त्यांनी बळी केलं.” त्या अनुभवाच्या आठवणीने उपस्थित सगळेच स्तब्ध झाले.
पळून वाचलेला जीव
त्या म्हणाल्या, “आम्ही घोड्यावरून खाली उतरत होतो. पाय चिखलात रुतत होते. जीव वाचवण्यासाठी कसाबसा पळत सुटलो. मात्र, आमचा घोडेवाला आणि ड्रायव्हर दोघेही मुस्लिम होते, आणि त्यांनी आमच्यावर प्रेमाने हात दिला. आम्हाला सुरक्षित पोहोचवलं.”
हल्ल्यात महाराष्ट्रातील बळी गेलेले नागरिक
अतुल मोने – डोंबिवली
संजय लेले – डोंबिवली
हेमंत जोशी – डोंबिवली
संतोष जगदाळे – पुणे
कौस्तुभ गणबोटे – पुणे
दिलीप देसले – पनवेल
दहशतवाद्यांच्या अमानुषतेने सुन्न झालेलं देशाचं मन
या नृशंस हल्ल्याने पुन्हा एकदा काश्मीरमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. धार्मिक ओळखीवरून लोकांना निवडून मारणं ही अमानुषता असून, केंद्र सरकारने तातडीने कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी देशभरातून होऊ लागली आहे.







Comments are closed