India Morning News
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदारांची नावे कापणे व मतदारसंख्या कृत्रिमरीत्या वाढवण्याच्या मुद्द्यावरून भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी कर्नाटकमधील आलंद विधानसभा मतदारसंघात मतदारांची नावं कापली गेली तसेच महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मतदारसंख्या वाढवण्यात आली, असे दस्तऐवज दाखवत आरोप केले.
तथापि, राहुल गांधींच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाने तात्काळ प्रतिक्रिया देत त्यांना सरळ फेटाळून लावले. आयोगाने स्पष्टपणे सांगितले की, राहुल गांधींनी केलेले सर्व दावे निराधार व दिशाभूल करणारे आहेत. कॉल सेंटरच्या माध्यमातून मतदारांची नावे हटवल्याचा आरोप तर “पूर्णतः अशक्य” असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
आयोगाने सांगितले की, कोणत्याही मतदाराचे नाव वगळण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी केली जाते व त्या मतदाराचे म्हणणे ऐकले जाते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने नाव हटवू शकते, असा राहुल गांधींचा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले.
यासंदर्भात आयोगाने आणखी माहिती देताना सांगितले की, २०२३ मध्ये आलंद मतदारसंघात मतदारांची नावे हटवण्याचा प्रकार समोर आला होता, मात्र त्याविरोधात स्वतः निवडणूक आयोगानेच तक्रार दाखल केली होती. याच निवडणुकीत आलंदमधून काँग्रेसचे बी.आर. पाटील विजयी झाले होते. एकंदरीत, राहुल गांधींच्या गंभीर आरोपांची हवा निवडणूक आयोगाने स्पष्टीकरणासह काढून टाकली आहे.











Comments are closed