India Morning News
मुंबई:काश्मीरमधील पहलगाम परिसरात मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला असून सुरक्षा यंत्रणांवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने खास विमानाने काश्मीरमध्ये दाखल झाले. त्यांनी श्रीनगरमधील राजभवनात उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला सौदी अरेबियाचा दौरा थांबवत भारतात परतण्याचा निर्णय घेतला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही अमेरिकेतील दौरा अर्धवट सोडून परतल्या आहेत. आज दिल्लीत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक होणार आहे.
शाह यांचा मेंदू देशाच्या सुरक्षेपेक्षा राजकारणात जास्त गुंतलेला
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट करत अमित शाहांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी लिहिलं, “अमित शाहांचा मेंदू वर्षभर विरोधकांना संपवण्याच्या डावपेंचात गुंतलेला असतो. देशाची सुरक्षा रामभरोसे सोडली आहे. आता रामही या परिस्थितीला कंटाळला आहे.”
सरकार पाडण्यात गुंतलेले मंत्री जनतेच्या सुरक्षेबाबत उदासीन
“राजीनामा द्या! सत्तेच्या राजकारणात व्यस्त राहून सामान्य जनतेच्या सुरक्षेचा विचार करण्यास वेळ नसलेल्या नेत्यांनी देशावर उपकार करावेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या पोस्टमध्ये राऊतांनी अमित शाह यांच्यासोबतच भाजप आणि संयुक्त राष्ट्र संघालाही टॅग केलं आहे.
महाराष्ट्र सरकारची तातडीची मदतविनंती
या हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी संवाद साधून जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची मागणी केली आहे. नायडूंनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक ती व्यवस्था केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे.










Comments are closed