India Morning News
मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेने QR कोड स्कॅन करून तिकीट घेण्याची सेवा कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला असून ४ सप्टेंबर २०२५ पासून या नियमाची अंमलबजावणी झाली आहे. आता प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी तिकीट खिडकी, एटीव्हीएम मशीन किंवा जेटीबीएस केंद्रांचा वापर करावा लागणार आहे. मात्र, UTS मोबाईल ॲपद्वारे तिकीट घेण्याची सुविधा सुरूच राहणार आहे.
२०१६ मध्ये UTS मोबाईल ॲप सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी QR कोड स्कॅन करून तिकीट घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे प्रवाशांना रांगेत उभे न राहता सहज तिकीट मिळत होते. पण कालांतराने या सुविधेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ लागला. अनेक प्रवासी तिकीट तपासनीस दिसल्यावरच तातडीने QR कोड स्कॅन करून तिकीट काढत. तसेच इंटरनेटवर सहजपणे QR कोड उपलब्ध झाल्याने कुठूनही तिकीट मिळवणे शक्य होत होते. या प्रकारामुळे रेल्वेला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने जुलै महिन्यातच मंडळाकडे ही सेवा बंद करण्याची शिफारस केली होती. रेल्वे बोर्डाने ती मंजूर करत निर्णय अमलात आणला आहे. याआधीच पश्चिम रेल्वेने QR कोड तिकीट सेवा बंद केली होती. त्यामुळे आता या दोन्ही प्रमुख मार्गांवर ही सुविधा बंद झाली असून प्रवाशांना स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी तिकीट घेणे बंधनकारक ठरणार आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासन नव्या प्रणालीवर काम करत असून स्थानकांवर डायनॅमिक QR कोड बसवण्याचा विचार आहे. हे कोड काही सेकंदांनी बदलत राहतील, त्यामुळे त्यांचा गैरवापर होणे अशक्य होईल. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना पारंपरिक पद्धतीनेच तिकीट घ्यावे लागणार आहे.






Comments are closed