India Morning News
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप–जेडीयू महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तेच्या समीकरणांवर नवी चर्चा सुरू झाली आहे. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील की नवा राजकीय प्रयोग घडेल, याबद्दल तर्कवितर्क रंगत आहेत.
भाजपने 89 आणि जेडीयूने 85 जागा जिंकल्या आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत असूनही नितीश कुमार यांच्या स्वतंत्र हालचालीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. दहाव्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता असलेल्या नितीश यांच्या हातात सत्तेचा ताबा वळवण्याची कळी आहे, असे मानले जात आहे.
विधानसभेचा बहुमत आकडा 122 आहे. जेडीयूचे 85 आमदार आणि काही विरोधकांना आपल्या बाजूला ओढण्यात ते यशस्वी ठरले, तर ‘बिगर भाजप’ सरकारचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा आहे. आरजेडी, काँग्रेस, एआयएमआयएम आणि काही अपक्षांचा पाठिंबा मिळाला, तर बिहारचे राजकारण एका क्षणात बदलू शकते.
निकाल निश्चित असला, तरी सत्तेचे अंतिम चित्र अजूनही अस्पष्ट आहे. बिहारमध्ये महाराष्ट्रासारखा ट्विस्ट घडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










