India Morning News
नवी दिल्ली :
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी केलेल्या विधानानं राजकीय वातावरण तापवलं आहे. खरगे यांनी ठामपणे सांगितलं की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालणं गरजेचं आहे, कारण देशात उद्भवणाऱ्या बहुतांश कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्या या भाजप-आरएसएसमुळे निर्माण होत आहेत.
पटेल जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर खरगे यांनी प्रतिहल्ला चढवला. त्यांनी 1948 मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएसवर व्यक्त केलेल्या नाराजीचा उल्लेख करत सांगितलं की, देशात द्वेषाचं वातावरण तयार करण्यात संघाची भूमिका होती, हे पटेल यांनीच स्पष्ट केलं होतं.
खरगे पुढे म्हणाले, “माझं हे वैयक्तिक मत आहे, पण मला वाटतं आरएसएस आणि भाजप यांच्या विचारांमुळेच समाजात फूट पाडली जात आहे. त्यामुळे संघावर बंदी आणण्याचा गंभीर विचार व्हायला हवा.”
ते म्हणाले, “आज आपण दोन महान नेत्यांना स्मरतो. देशाचे ‘लोहपुरुष’ सरदार पटेल आणि ‘लोहपुरुषी’ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. या दोघांनीही देश एकसंध ठेवण्यासाठी मोठं योगदान दिलं. मात्र आज काही शक्ती देशाची एकता खिळखिळी करण्याचं काम करत आहेत.”
खरगे यांनी यावेळी सरदार पटेल यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांना लिहिलेल्या पत्राचाही दाखला दिला. त्या पत्रात पटेल यांनी म्हटलं होतं की, संघाने तयार केलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे महात्मा गांधींची हत्या घडून आली.
“भाजप नेहमी नेहरू आणि पटेल यांच्यात मतभेद दाखवण्याचा प्रयत्न करते, पण प्रत्यक्षात दोघांमध्ये प्रचंड परस्पर आदर होता,” असं खरगे यांनी सांगितलं. त्यांनी नमूद केलं की, नेहरूंनी पटेलांच्या राष्ट्रीय एकतेसाठीच्या कार्याचं कौतुक केलं होतं, तर पटेल यांनी नेहरूंना आदर्श नेता म्हणून गौरवलं होतं.










