India Morning News
नवी दिल्ली:देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा गडद होत असून, आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांत ६ रुग्णांनी जीव गमावला आहे. यामध्ये अहमदाबादमधील १८ वर्षीय गर्भवती आणि ४७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३,८०७ वर पोहोचली असून, गेल्या १० दिवसांत रुग्णसंख्येत तब्बल १५ पट वाढ झाली आहे.
केरळ आघाडीवर, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये असून, येथे सध्या १,४३५ सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे सध्या ५०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत जानेवारीपासून आतापर्यंत ४११ रुग्ण आढळले आहेत. एकूण राज्यात १०,३२४ चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील ६८१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मृत्यूंची मालिका सुरूच
गेल्या काही दिवसांत कोरोना मृत्यूंची मालिका सुरूच आहे. अहमदाबादमध्ये सोमवारी १८ वर्षीय गर्भवती मुलगी आणि ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्याआधी रविवारी दिल्लीत २२ वर्षीय युवती व तामिळनाडूत २५ वर्षीय तरुणाचा बळी गेला. एकूण मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे.
कर्नाटकमध्ये सल्लागार सूचना जारी
रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता कर्नाटक सरकारने सार्वजनिक आरोग्य सल्लागार जारी केला आहे. यामध्ये नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे आणि लक्षणे आढळल्यास चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या राज्यात २३८ सक्रिय रुग्ण आहेत.
मिझोराममध्ये ७ महिन्यांनी रुग्ण
सुमारे सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर मिझोराममध्ये पुन्हा कोविड-१९ चे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी दोन जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांवर ऐझॉलजवळील झोरम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. राज्यात शेवटचा रुग्ण ऑक्टोबर २०२४ मध्ये आढळला होता.
केंद्र सरकारकडून सतर्कतेचा इशारा
कोरोनाच्या नव्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना टेस्टिंग वाढवण्याचे, हॉस्पिटल बेड्स, औषधे व ऑक्सिजनचा साठा राखण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नागरिकांना पुन्हा एकदा कोविडप्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सावधगिरीच हाच बचावाचा उपाय!
– सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा
– वारंवार हात धुवा
– गर्दी टाळा
– लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करा








Comments are closed