India Morning News
देशभरात पुन्हा एकदा कोरोनाबाबत चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, 30 मेपर्यंत देशात एकूण 2710 सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत. विशेष म्हणजे केवळ चार दिवसांत तब्बल 1700 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 26 मे रोजी ही संख्या 1010 होती.
गेल्या 24 तासांत देशात 511 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये दिल्लीतील एका 60 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. यावर्षी दिल्लीत कोरोना संसर्गामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे.
दिल्लीमध्ये सध्या 294 सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 214 लोकांनी कोरोनामुक्ती मिळवली आहे. गेल्या 24 तासांत 56 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातही परिस्थिती चिंताजनक आहे. येथे सध्या 467 सक्रिय रुग्ण आहेत आणि आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सातपैकी एक व्यक्ती दिल्लीतील असून, उर्वरित मृत्यू गुजरात, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात झाले आहेत.
दरम्यान, एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार सध्या जेएन.1 हा व्हेरिएंट अधिक प्रचलित आहे. या प्रकारामुळे संसर्गाची शक्यता वाढलेली असली, तरी त्याची लक्षणे सौम्य असून रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगावी, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्याचे संक्रमण प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये अधिक गंभीर स्वरूपात दिसून येत आहे.










Comments are closed