India Morning News
मुंबई :-राज्य सरकारच्या पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली असून, पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सुरुवातीला हा मोर्चा ६ जुलै (रविवार) रोजी निघणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, आता या मोर्च्याची तारीख बदलण्यात आली असून तो ५ जुलै (शनिवार) रोजी काढण्यात येणार आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक निवेदन प्रसिद्ध करून या बदलाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की –
“आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडासा बदल असून, हा मोर्चा आता ५ जुलै शनिवार, सकाळी १० वाजता होणार आहे. बाकी ठिकाण व सर्व तपशील पूर्ववत राहतील. माध्यमांनी आणि जनतेने याची नोंद घ्यावी.”
सरकारच्या त्रिभाषा धोरणातून उद्भवणाऱ्या संभाव्य परिणामांविषयी मनसेने चिंता व्यक्त केली असून, मराठी भाषेच्या अस्मितेवर गदा येईल, अशी भूमिका पक्षाने स्पष्टपणे मांडली आहे. त्यामुळेच हा मोर्चा मराठी भाषेच्या हक्कांसाठी आणि सरकारच्या निर्णयाला थेट विरोध करण्यासाठी आयोजित केला जात आहे.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्च्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे










Comments are closed