India Morning News
पुणे:- महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या ‘चरण सेवा’ रथाचे लोकार्पण आज पुण्यात येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते थाटात संपन्न झाले. आषाढी वारीच्या पवित्र यात्रेत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा रथ एक अनोखा उपक्रम ठरणार आहे.
‘चरण सेवा’ रथाच्या माध्यमातून आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांना २४ तास वैद्यकीय सेवा, तपासणी आणि मोफत औषध वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, तातडीच्या वैद्यकीय गरजांसाठी ॲम्बुलन्स सुविधाही या रथासोबत उपलब्ध आहे. या रथात प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स आणि आवश्यक औषधांचा साठा असून, वारकऱ्यांना प्राथमिक उपचार तसेच आरोग्य तपासणीची सोय मोफत मिळणार आहे.
लोकार्पण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख आहे. लाखो वारकरी विठ्ठलाच्या भक्तीने पंढरपूरच्या दिशेने चालत येतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. ‘चरण सेवा’ रथ हा भक्ती आणि सेवेचा अनोखा संगम आहे.”
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून, सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. या रथाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आरोग्यसेवा मिळणार असून, केंद्र आणि राज्य शासन मिळून वारकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे.”








Comments are closed