India Morning News
– जिल्हा प्रशासनाची निवडणूक तयारी पूर्ण; मतदारांना उत्साहाने मतदानाचे आवाहन
नागपूर:राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील प्रशासनाने निवडणुकीसाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील १५ नगर परिषद आणि १२ नगर पंचायतींमध्ये निवडणुका पार पडणार असून, त्या मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सदर येथील जिल्हा नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, नामनिर्देशन प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून मतदान २ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित क्षेत्रातील आचारसंहिता समाप्त होईल.
“प्रत्येक मतदाराने लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे,” असे आवाहन डॉ. इटनकर यांनी केले. त्यांनी नागरिकांना मतदानाबाबत जागरूक राहण्याचे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले.
या निवडणुकांमध्ये ३७४ प्रभागांतून ५४६ सदस्यांची निवड होणार असून, सुमारे ७ लाख ३२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. २७ निवडणूक निर्णय अधिकारी, २७ सहायक अधिकारी आणि एकूण ४,४५५ अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कार्यरत राहणार आहेत.
“नागपूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. शांतता, पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांचा आदर राखत निवडणुका यशस्वीपणे पार पडतील,” असा ठाम विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी व्यक्त केला.











