India Morning News
जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर
▪नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोखरा अंतर्गत विकासाची व्यापक संधी
नागपूर, दि. 7:- दिवसेंदिवसा सरासरी तापमानात होणारी वाढ, वातावरणात होत असलेले बदल, अनियमित पाऊस, तिव्र दुष्काळ, मोठे पूर, जमिनितील पोषक द्रव्य यांचा होणारा नाश, पातथळ, जमिनिची धूप यातून जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना सावरता यावे या उद्देशाने शासनाने पोखरा ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेत गावातील सर्वांची सहमती घेऊन ग्राम कृषी विकास समिती ही अधिक प्रभावीपणे काम करु शकते. कृषी विभागाने या योजनेची अंमलबजावणी करतांना प्रत्यक्ष गावकऱ्यांची, ग्राम पंचायतीशी संपर्क साधून गावाचा विकास आराखडा तयार करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
जिल्ह्यातील 321 ग्राम पंचायती, पोखरा अर्थात नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत समाविष्ट आहेत. या ग्राम पंचायतीअंतर्गत एकूण 563 गावांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. ग्राम पंचायत पातळीवर लोक सहभाग घेऊन गावातील ग्राम कृषी विकास समिती मार्फत सर्व कामे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, तीन प्रगतशील शेतकरी (एक महिला), विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष (एक) शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांचे प्रतिनिधी (एक), महिला बचत गट प्रतिनिधी (एक), कृषी पूरक व्यवसायी शेतकरी (दोन) तलाठी हे या समितीचे सदस्य असतील. कृषी सहायक हे सहसचिव तर ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी हे सदस्य सचिव असतील.
याचबरोबर ॲग्रीस्टॅक योजनेच्या नोंदणीबाबत कृषी विभागाच्या विशेष बैठकीत आढावा घेण्यात आला. लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी अधिकगतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभाग व सर्व तहसिल कार्यालयामध्ये दिले. तालुका पातळीवरील कृषी अधिकाऱ्यांनी या नोंदणीसाठी अधिक दक्ष राहून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.






Comments are closed