India Morning News
नागपूर : “महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, याला महायुती सरकारचे खोटे आश्वासन आणि दिशाभूल करणारी धोरणे जबाबदार आहेत,” असा घणाघात काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूरमध्ये बोलताना त्यांनी प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या उपोषणाला काँग्रेसचा ठाम पाठिंबा असल्याचे सांगितले.
वडेट्टीवार म्हणाले, “जो कुणी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरेल, त्याच्या मागे काँग्रेस खंबीरपणे उभी राहील. बच्चू कडू यांचे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाशी संबंधित आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत.”
कर्जमाफी संदर्भातील शासकीय समितीवर टीका करत त्यांनी सांगितले की, “ही फक्त वेळकाढूपणा करण्याची आणि जनतेची फसवणूक करण्याची खेळी आहे. आम्ही सत्तेत असताना ३९ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. आमची भूमिका कायमच प्रामाणिक राहिली आहे.”
शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “गेल्या दोन वर्षांत पूर, अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर कोसळल्या, पण सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. लोकांना हिंदू-मुस्लिम प्रश्नात गुंतवून खरी समस्या दडपली जात आहे.”
शिवाय, वडेट्टीवार यांनी सरकारवर जमीन वाटपावरूनही गंभीर आरोप केले. “आमच्या सरकारने निधी उभारण्यासाठी कर वाढवला होता. पण सध्याचं सरकार मात्र मुंबईतील मौल्यवान जमीन उद्योगपती अदानी यांना देऊन जनतेच्या हक्कांवर गदा आणत आहे,” अशी टीका त्यांनी केली.
वडेट्टीवारांच्या या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शेतकरी प्रश्नावरून सरकारला जाब विचारला जाईल, असे संकेत मिळत आहेत.









Comments are closed