India Morning News
अमरावती :-
शेतकरी, दिव्यांग आणि विधवा महिलांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांचं वजन चार किलोने घटलं असून रक्तदाबातही चढ-उतार होत आहे. मात्र, कडूंनी अजूनही आंदोलन मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे.
“हे आमच्या अस्तित्वासाठीचं आंदोलन”
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, “हे आंदोलन केवळ काही मागण्या पूर्ण करण्यासाठी नाही, तर आमच्या अस्तित्वासाठी आहे. जातीधर्माच्या पलिकडे शेतकरी माणूस जगला पाहिजे. मरण आलं तरी चालेल, पण मागे हटणार नाही.”
राजकीय पातळीवर पाठिंबा वाढतोय
राज्यभरातून अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक बच्चू कडूंना पाठिंबा देत आहेत. आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमत असून, यामुळे शासनावर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रहार कार्यकर्तेही आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या तयारीत आहेत.
शरद पवारांचा संपर्क, मनोज जरांगे यांची भेट आज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडूंशी फोनवरून संपर्क साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून, आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. हा संवाद नितेश कराळे मास्तर यांच्या मध्यस्थीने घडून आला. दरम्यान, मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे आज आंदोलनस्थळी भेट देणार असून, त्यांच्या भेटीमुळे आंदोलनाला नवे बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बावनकुळे यांच्यावर कडूंचा निशाणा
आपल्या वक्तव्यात बच्चू कडूंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. “मुख्यमंत्री मंदिरात पुण्य कमावत आहेत, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाही,” असा घणाघात त्यांनी केला.
सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसून, बच्चू कडूंच्या प्रकृतीचा विचार करता आंदोलनाची दिशा आणि परिणाम पुढील काही तासांत निर्णायक ठरणार आहेत.










Comments are closed