India Morning News
मुंबई :- राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रावरील आपला निर्णय मागे घेतला असून, या निर्णयामागे ठाकरे बंधूंच्या एकतेचा दबाव होता, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. “राज ठाकरे यांनी मोर्चासाठी साद घातली आणि त्यानंतर काही क्षणात उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा दर्शवला. यामुळे सरकार घाबरलं आणि हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
राऊत म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे. मराठीसाठी पुढील काळात ठाकरे बंधू सतत एकत्र दिसतील. सरकारने केवळ राजकीय दबावापोटी मागे पावलं आहे, मराठी माणसाच्या भावना ओळखून नव्हे.
फडणवीस-शिंदे, फडणवीस-अजित पवार, फडणवीस-मुश्रीफ एकत्र येऊ शकतात, मग दोन भाऊ एकत्र आल्यावर विरोधक अस्वस्थ का होतात? असा सवाल करत राऊतांनी भाजपवर टोला लगावला.
भाजपकडून वारंवार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा सूत्र स्वीकारल्याचा दावा केला जातोय. यावर पलटवार करत राऊत म्हणाले, “हे फडणवीसांचं खोटं बोलणं आहे. अहवाल टेबलवर आणा, हवेत बोलून लोकांची दिशाभूल करू नका.”
५ जुलै रोजी होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे मराठी अस्मितेचा जल्लोष असल्याचंही राऊतांनी सांगितलं. “मोर्चासाठी दोन्ही बाजूंनी तयारी पूर्ण झाली आहे. लाखोंच्या संख्येने मराठी जनता रस्त्यावर उतरणार होती, त्यामुळेच सरकारने घाईघाईने निर्णय मागे घेतला,” असा आरोपही त्यांनी केला.
यापुढेही मराठी प्रश्नांवर सरकारला वारंवार माघार घ्यावी लागेल, अशी चेतावणी संजय राऊत यांनी अखेर दिली








Comments are closed