India Morning News
नागपूर: नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांचा ३९,७१० मतांनी पराभव केला होता. मात्र, या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गुडधे यांनी आणि नागपूरमधील आणखी काही काँग्रेस उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याचिकेनुसार, निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने कायदेशीर प्रक्रिया आणि नियमांचे उल्लंघन केले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिसूचनेचा अभाव, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉर्म क्रमांक १७ न मिळणे, व्हीव्हीपॅट मोजणीसाठी पैसे भरल्यानंतरही ती न करणे तसेच माहिती अधिकार अंतर्गत माहिती न देणे यांसारख्या अनेक त्रुटींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
गुडधे यांनी मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या संभाव्य गैरप्रकार आणि नियमभंगामुळे फडणवीसांचा विजय रद्द करावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने मुख्यमंत्री फडणवीस यांना ८ मे रोजी उत्तर सादर करण्याचे समन्स बजावले असल्याची माहिती गुडधे यांचे वकील पवन दहत यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान अनेक अनिवार्य तरतुदींचे उल्लंघन झाले आहे.
दरम्यान याचिकेत अशी मागणी केली आहे की, फडणवीस यांचा विजय रद्द करण्यात यावा आणि नवीन निवडणूक जाहीर केली जावी. याचिकेवर प्राथमिक सुनावणीदरम्यान न्यायालयाने देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), मोहन मते (नागपूर दक्षिण), आणि कीर्तिकुमार भांगडिया (चिमूर)या तिन्ही आमदारांना समन्स बजावले आहे.










Comments are closed