India Morning News
मुंबई : राजकारणात जाती-पातीचा विचार न करता सर्वधर्मसमभाव राखत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पक्षप्रवेश कार्यक्रमात स्पष्टपणे सांगितलं. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटातील अनेक प्रमुख पदाधिकार्यांनी केसी कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजित पवारांनी आपल्या विचारांची मांडणी केली.
“राजकारणात जात-पात, धर्म कधीच महत्त्वाचा ठरला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जातींच्या लोकांना सोबत घेत राजकारण केलं, तशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसही काम करत आहे,” असं ते म्हणाले. तसेच, “मी सत्तेसाठी कधीही हापापलेलो नाही. अनेक वेळा मी सत्तेचा अनुभव घेतला आहे, आणि काही लोक सोयीच्या गोष्टी सांगत आहेत. आमच्या पक्षाचे सर्व आमदार सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी तयार होते,” अशी त्यांची प्रतिक्रिया होती.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)च्या वापरावरही ते म्हणाले, “आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता हे अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे. याशिवाय राज्यातील विकास साधता येणार नाही. प्रत्येक क्षेत्रात याचा वापर होईल, आणि या तंत्रज्ञानामुळेच रोजगार निर्माण होईल.”
कार्यक्रमात जळगाव, धुळे, नंदुरबार, रावेर येथील जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचे संचालक, पंचायत समिती आणि बाजार समितीतील शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाले. यामध्ये माजी मंत्री सतिश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे आणि धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील यांचा समावेश होता.










Comments are closed