India Morning News
बुलडाणा : “कथा-कादंबऱ्या वाचण्याची सवय आम्ही फार पूर्वीच सोडून दिली आहे. आता अशा प्रकारचं बालवाङ्मय वाचण्याचं वयही मागे पडलं आहे,” अशा खोचक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना टोला लगावला.
बुलडाणा जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी शहरात आलेल्या मुख्यमंत्र्यांना माध्यम प्रतिनिधींनी राऊत यांच्या पुस्तकाविषयी विचारले असता त्यांनी हे उत्तर दिलं. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी काही वक्तव्ये करण्यात आली आहेत. “आम्ही अजून काही लिहिलं असतं तर मोठा स्फोट झाला असता,” असं राऊत यांनी म्हटलं होतं.
यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “अशा काल्पनिक गोष्टींवर गांभीर्याने चर्चा करण्याची आवश्यकता नाही. त्या फक्त मनोरंजनापुरत्याच आहेत.” पुढे ते म्हणाले, “हे राऊत नेमके कोण आहेत? कुठल्या दर्जाचे नेते आहेत?” असा प्रश्न विचारून त्यांनी पुन्हा एकदा राऊतांवर टीका केली.
महायुतीच्याच माध्यमातून लढणार निवडणुका
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या जातील. काही ठिकाणी स्थानिक स्वरूपात वेगळी भूमिका घ्यावी लागल्यास ती समन्वयातून ठरवली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
डीजी कर्ज प्रकरण मार्गी
पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांसाठी डीजी कार्यालयाच्या शिफारशीनुसार मिळणाऱ्या कर्ज प्रकरणांबाबत विचारण्यात आलं असता फडणवीस म्हणाले, या प्रकरणासाठी आवश्यक मंजूरी दिली गेली असून हे प्रकरण आता मार्गी लागत आहे.










Comments are closed