India Morning News
मुंबई: दहशतवाद्यांवर भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आगळीक करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाची स्थिती आहे. तर, दुसरीकडे मुंबईतही हालचालींना वेग आला आहे. मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपात्कालीन बैठक बोलावली आहे. आज दुपारी ही उच्चस्तरीय सुरक्षा बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील स्थितीचे आकलन करणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना आखण्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानमधील एअर स्ट्राइकनंतर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे आदी ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव-
पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मध्यरात्री पाकिस्तानकडून विविध ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. भारताने जवळपास 50 पाकिस्तानी ड्रोन पाडले.
गुरुवारची रात्र ही भारतासाठी वैऱ्याची रात्र ठरली आहे. पाकिस्तानने अगदी जम्मू काश्मीरच्या लडाखपासून गुजरातमधील भूजपर्यंत अनेक ठिकाणांना मध्यरात्री टार्गेट केलं होतं. पाकिस्तानने भारतावर जवळपास 50 हून अधिक ड्रोन सोडले होते. पण भारतीय सैन्य दलाच्या डिफेन्स सिस्टीमने सर्व ड्रोन पाडले आहेत. पहाटेच्या सुमारास संपूर्ण देश साखर झोपेत असताना पाकिस्तानने भारताचा घात करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्यांनी पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला.








Comments are closed