India Morning News
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वाचे निर्णय घेत सुरक्षेच्या दृष्टीने देशभरात खबरदारीचे उपाय सुरु केले आहेत.
पाकिस्तानविरोधात केंद्र सरकारने कठोर धोरण अवलंबण्यास सुरुवात केली असून, काही महत्त्वाच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. या पावलांमुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सुरक्षा संबंधित उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. रविवारी वायुसेना आणि नौदल प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेऊन राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा घेतला.
दरम्यान, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे रोजी नागरी संरक्षणाशी संबंधित मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. या मॉक ड्रिलद्वारे संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची तयारी कितपत सक्षम आहे, याची चाचपणी केली जाणार आहे. ही माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे.
देशात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, सर्व स्तरांवर उपाययोजना अधिक गतिमान करण्यात येत आहेत.










Comments are closed