India Morning News
नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर न्यायालयाच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे. लखनौ न्यायालयाने राहुल गांधींविरुद्ध जारी केलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच, राहुल गांधींना बेजबाबदार वक्तव्ये करू नका, असा इशारा देत सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणे हा गंभीर मुद्दा आहे, आणि भविष्यात अशा प्रकारच्या विधाने केल्यास न्यायालय तीव्र कारवाई करू शकते. न्यायालयाने राहुल गांधींना चेतावणी दिली की, “तुम्ही महाराष्ट्रात हे विधान केले. तेथे लोक सावरकरांची पूजा करतात. तुमच्या आजीनेही सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणणार का?” न्यायालयाने इशारा दिला की, स्वातंत्र्यसैनिकांविषयी असत्य विधान करण्याचा कोणालाही अधिकार नाही.
दरम्यान, २७ डिसेंबर २०२२ रोजी अकोला जिल्ह्यात राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल एक विधान केले होते. त्या वेळी त्यांनी सावरकरांना ‘ब्रिटिशांचा सेवक’ म्हणून संबोधित केले होते. राहुल गांधी यांच्या विधानानंतर अनेक राजकीय व सामाजिक वर्तुळांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमठल्या होत्या.
राहुल गांधी यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत सांगितले की, त्यांच्या विधानांचा कोणालाही चिथावणी देण्याचा हेतू नव्हता. परंतु, न्यायालयाने यावर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, जर त्यांना चिथावणी देण्याचा उद्देश नव्हता, तर अशा शब्दांचा वापर का केला?
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना कडक सल्ला दिला आहे की, त्यांनी राजकारण करत असताना अशा प्रकारची विधाने केली, जी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करत आहेत. न्यायालयाने सूचित केले की, भविष्यात अशी विधाने केल्यास ते स्वतःहून दखल घेतील. लखनौ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, या प्रकरणावर आगामी सुनावणी केली जाणार आहे










Comments are closed