India Morning News
नवी दिल्ली:
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी समाजातील वाढती आर्थिक विषमता ही लोकशाहीवर थेट हल्ला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, देशातील श्रीमंतांचा वर्ग दिवसेंदिवस मोठा होत आहे, तर गरिबांचा समूह सतत मागे राहतो आहे. या विषमतेमुळे सामाजिक असुरक्षा आणि असंतोष वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले.
रमेश यांनी एका ताज्या अहवालाचा हवाला देत सांगितले की, केवळ काही हजार लोकांकडेच देशातील संपत्तीची मोठी टक्केवारी केंद्रीत झाली आहे. ”लाखो लोक रोजच्या गरजा भागवण्यासाठी झुंजत आहेत, तर काही उद्योगपती व श्रीमंत व्यक्ती सरकारच्या धोरणांचा लाभ घेऊन अधिक श्रीमंत होत आहेत. मोदी सरकारच्या धोरणांमुळे संपत्ती एका लहान गटात केंद्रित होत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर, रमेश यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांवर चालू असलेल्या दबावावरही लक्ष वेधले. ”देशाच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणातील अपयशामुळे छोटे उद्योजक दुहेरी संकटाला सामोरे जात आहेत. परिणामी, सामान्य नागरिकांसाठी रोजगार आणि कमाईची संधी कमी होत चालली आहे,” असे ते म्हणाले.
महागाईच्या वाढत्या दबावामुळे मध्यमवर्गीय नोकरदार कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहे, अशी चिंता रमेश यांनी व्यक्त केली. त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित करत ते लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना धोका पोहोचवत असल्याचे नमूद केले.












Comments are closed