India Morning News
पुणे:कोथरूड प्रभागातील जय भवानी नगर येथील नवभारत मित्र मंडळ आणि सुतारदरा परिसरातील समर्थ महिला मंडळ येथे नागरिक व कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन स्थानिक पातळीवरील विविध विकासकामांवर सविस्तर हर्षवर्धन मानकर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला प्रभागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठ्याची अडचण, दिवाबत्ती व्यवस्था, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर निर्माण झालेल्या समस्यांची सखोल माहिती घेण्यात आली. नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डे, अपुरा पाणीपुरवठा, रात्रीच्या वेळी अंधार आणि कचर्याची समस्या याबाबत तक्रारी मांडल्या. याशिवाय, उद्यानांच्या देखभाली आणि रस्त्यांच्या रुंदीकरणाची मागणीही जोरदारपणे उपस्थित करण्यात आली.
या सर्व मागण्यांचा तातडीने पाठपुरावा करून संबंधित विभागांमार्फत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि प्रशासनाशी सातत्यपूर्ण संवाद आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत, लोकसहभागातून प्रभागातील सर्व समस्या सोडवण्याचा निर्धार हर्षवर्धन मानकर यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.
या बैठकीमुळे प्रभागातील विकासकामांना गती मिळेल आणि स्थानिक समस्या लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.






