India Morning News
नवी दिल्ली :- “इंग्रजी ही भाषा गुलामगिरीचं प्रतीक नाही, ती सामाजिक बदलाची आणि संधीची भाषा आहे,” असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
शुक्रवारी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं की, “BJP-RSS ला वाटतं गरीब मुलांनी इंग्रजी शिकू नये, कारण हीच शिकवण त्यांना पुढे नेऊ शकते – आणि हेच त्यांना नको आहे.”
राहुल गांधी म्हणाले, “इंग्रजी ही श्रीमंत आणि गरीब यांच्यातील अंतर भरून काढणारा पूल आहे. ती आत्मविश्वास देते, नव्या संधी उघडते आणि जागतिक पातळीवर उभं राहण्याची ताकद देते.”
त्यांनी भारतीय भाषांचं महत्त्व मान्य करत सांगितलं की, “प्रत्येक भारतीय भाषेमध्ये संस्कृती आणि आत्मा दडलेला आहे. त्या आपण जपायलाच हव्यात, मात्र त्याचबरोबर गरिबांनाही इंग्रजी शिकण्याची समान संधी मिळाली पाहिजे.”
काँग्रेसचा आरोप आहे की, BJPचं शिक्षण धोरण हे गरीब, मागास आणि वंचित घटकांना संधीपासून दूर ठेवण्याचं काम करतं. राहुल गांधींच्या मते, भाषा आणि शिक्षण या शक्तिशाली साधनांचा उपयोग सामाजिक समता निर्माण करण्यासाठी व्हायला हवा.
राजकीय वर्तुळात राहुल गांधींच्या या विधानाची तीव्र चर्चा सुरू असून, इंग्रजी शिक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी BJP आणि RSSला थेट आव्हान दिल्याचं स्पष्ट होत आहे.








Comments are closed