India Morning News
मुंबई: बंगालच्या उपसागरात 24 सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा पट्टा 28 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात दाखल होईल, ज्यामुळे 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होईल आणि किमान 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातून मान्सूनचा निरोप होण्याची शक्यता नाही.
22 ते 25 सप्टेंबरदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, विशेषत: दुपारनंतर. 26 सप्टेंबरपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव जाणवेल, ज्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व व दक्षिण भागात पावसाचा जोर वाढेल. 27 सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस तीव्र होऊ शकतो, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 28 सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहील.
शेतकऱ्यांना या हवामान अंदाजानुसार शेतीचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचे आव्हान कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे, असे हवामान खात्याने सुचविले आहे.








Comments are closed