India Morning News
मुंबई :सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वारे बदलले! माजी आमदार राजन पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील, माजी आमदार यशवंत माने आणि माढा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी आज भारतीय जनता पक्षात (भाजप) जोरदार प्रवेश केला. अनगरकरांसह शिंदे कुटुंबीयांचा हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भूकंप घडवणारा ठरला आहे.
मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कमळ चिन्ह स्वीकारण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. दोघांनी नवप्रवेशितांना पक्षात स्वागत करीत, सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः मोहोळ तालुक्यात अनगरकरांनी कमळ हाती घेतल्याने नवे समीकरण रचले जाणार. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, ‘जय भाऊ’ गोरे आणि ‘सचिन दादा’ कल्याणशेट्टी हे खरे गेम चेंजर ठरले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा मोठा ब्रेकथ्रू शक्य झाला.
भाजप नेत्यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात कमळ फुलवण्यासाठी हे प्रवेश मैलाचा दगड ठरतील. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भगदाड पाडणारा हा प्रसंग जिल्हा राजकारणात नव्या युगाची सुरुवात करेल, अशी चर्चा आहे.



