India Morning News
मुंबई: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मच्छिमार समुदाय आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने १०० कोटी रुपयांचा विशेष मदत निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ७ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निधीतून नुकसान झालेल्या बोटींची भरपाई तसेच प्रभावित मच्छिमारांच्या पुनर्वसनासाठी सहाय्य दिले जाणार आहे. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तात्काळ निर्णयाचे कौतुक केले. “मच्छिमारांच्या दु:खात सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे राणे यांनी ट्विट करत म्हटले.
या निर्णयामुळे किनारपट्टी भागातील हजारो मच्छिमारांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या उपजीविकेला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. सरकारकडून लवकरच निधीचे वितरण संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत सुरू होणार आहे.







Comments are closed