India Morning News
पुणे: “जनसेवा आणि देशसेवा हे शासकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. ‘नागरिक देवो भव:’ हा मंत्र आमच्यासाठी पूजेसारखा आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित 15 व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी देशभरातील 51,000 हून अधिक युवकांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली.
पुण्यातील यशदा संस्थेत आयोजित या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. यावेळी नड्डा यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी लाभार्थी युवकांचे अभिनंदन करत त्यांना नियुक्तीपत्रे सुपूर्द केली.
ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू झालेल्या रोजगार मेळावा उपक्रमाने आतापर्यंत देशभरातील 10 लाखांहून अधिक युवकांना राजस्व विभाग, गृह मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, उच्च शिक्षण विभाग, तसेच कामगार आणि रोजगार मंत्रालयासह विविध केंद्रीय मंत्रालये आणि संस्थांमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या प्रदान केल्या आहेत.
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, शासकीय अधिकारी, लाभार्थी युवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हा रोजगार मेळावा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरला.






Comments are closed