India Morning News
नागपूर : शहरात दोन दिवस पडलेली उष्णता आणि उकाड्यानंतर रविवारी रात्री हवामानाने अखेर गारवा दिला. मध्यरात्रीपासून ढगांची गर्दी वाढू लागली आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. यामुळे नागपूरकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. हवामान विभागानुसार, गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये १४.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहरात उकाड्याची तीव्रता जाणवली. मात्र शनिवारी रात्रीपासून काही भागांत हलकासा पाऊस सुरु झाला आणि रविवारी पहाटेपासून जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे शहरातील तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील २ ते ३ दिवस विदर्भासह नागपूरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. काही भागांत विजांसह सरीही कोसळू शकतात.
दरम्यान, मान्सून दाखल झाल्यानंतरही विदर्भातील अनेक भागांमध्ये अद्याप पुरेशी आणि सातत्यपूर्ण पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. जूनच्या अखेरीस झालेल्या सुरुवातीच्या पावसावर विसंबून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने बियाण्यांचे नुकसान झाले आहे आणि काही शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये अधिकच भर पडली आहे.










Comments are closed