India Morning News
मुंबई: भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पूर्ण केले. आज मध्यरात्री १:३० वाजता भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि लश्कर-ए-तोयबाच्या ९ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथील दहशतवादी कॅम्प्स आणि प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली.
भारतीय सेनेने या मोहिमेत केवळ दहशतवादी ठिकाणांवरच लक्ष्य साधले. पाकिस्तानी नागरिक किंवा लष्करी तळांना कोणताही धक्का लावण्यात आला नाही. बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय पूर्णपणे नष्ट करण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या या अचूक आणि नियोजित कारवाईने दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने तातडीने ‘ऑपरेशन सिंदूर’ची आखणी केली. दहशतवाद्यांच्या हालचालींवर गुप्तचर यंत्रणांनी बारीक लक्ष ठेवत माहिती गोळा केली होती. या माहितीच्या आधारे भारतीय हवाई दलाने मध्यरात्रीच्या सुमारास हल्ल्याची योजना यशस्वीपणे पार पाडली.
या मोहिमेद्वारे भारतीय सेनेने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश दिला आहे. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी भारत कोणतीही गय करणार नाही, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारतीय सेनेच्या सामर्थ्याचा आणि दहशतवादाविरुद्धच्या दृढनिश्चयाचा प्रत्यय पुन्हा एकदा जगाला दिला.










Comments are closed