India Morning News
नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘चांद्रयान’ यासारख्या ऐतिहासिक व वैज्ञानिक मोहिमांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचे सूतोवाच केल्यानंतर उत्तराखंड सरकारने तातडीने कृती करत निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील सर्व मान्यताप्राप्त मदरशांमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’चा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे.
सध्या उत्तराखंडमध्ये ४५१ नोंदणीकृत मदरसे असून त्यामध्ये सुमारे ५०,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच भारतीय लष्कराचे शौर्य, देशभक्ती आणि ऐतिहासिक सैनिकी मोहिमांविषयी माहिती मिळणार आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या या पावलामुळे शिक्षण आणि राष्ट्रप्रेम यांचा समन्वय साधला जाईल, असे शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. लहान वयातच मुलांमध्ये देशहिताची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही शालेय शिक्षणातून देशभक्तीची रुजवण करण्यावर भर देण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार चांद्रयान मोहिमेचाही अभ्यासक्रमात समावेश करत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या मोहिमा विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करत असून, त्यांना आधुनिक भारताच्या सामरिक क्षमतेची ओळख करून देत आहेत.
भारत-पाकिस्तान युद्धांमधील विजय, बांगलादेशची निर्मिती यासारख्या ऐतिहासिक घटकांची माहिती मुलांना देऊन त्यांच्यामध्ये जबाबदारीची भावना विकसित करणे हेच या निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे.








Comments are closed