India Morning News
गडचिरोली — विदर्भातील आदिवासी समाजाचे प्रभावशाली नेते आणि अजित पवार गटाचे निष्ठावान नेतृत्व धर्मराव बाबा आत्राम यांनी भाजपवर गंभीर आरोप करत महायुतीतील अस्वस्थतेला चुणूक दिली आहे. नागपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजपने विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांचा पराभव करण्यासाठी कटकारस्थाने रचल्याचा गौप्यस्फोट केला.
“माझ्या विरोधात भाजपनेच उमेदवाराला मदत केली. पैसे दिले, पाठबळ दिलं, काँग्रेसनंही हातभार लावला. पण तरीही जनतेच्या पाठिंब्यामुळे मी निवडून आलो,” असं स्पष्ट करत त्यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला.
माजी मंत्री असलेले आत्राम यांना यंदा मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजीही दिसून आली. “यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाच्याही मदतीची गरज नाही. आम्ही कोणत्याही तडजोडीला तयार नाही. स्वबळावर निवडणुका लढवू आणि सत्ता मिळवू,” असं स्पष्ट करत त्यांनी महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीनेही या निवडणुकीत शरद पवार गटातून उमेदवारी मिळवून त्यांच्याविरुद्ध बंड केलं होतं. मात्र, वडिलांच्या राजकीय अनुभवासमोर लेकीचा पराभव झाला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दिवाळीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढण्याचा दावा केला असला, तरी आत्राम यांच्या घोषणेमुळे स्थानिक पातळीवर वेगळं चित्र उभं राहत आहे.आता महायुती एकजुटीने लढणार की वेगळी वाट पकडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.










Comments are closed