India Morning News
नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१३ मे) पहाटे अचानक पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. पाकिस्तान सीमेपासून अगदी जवळ असलेल्या या महत्त्वाच्या लष्करी तळावर त्यांनी हवाई दलाच्या शूरवीर जवानांशी संवाद साधला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात त्यांचं विशेष कौतुक केलं.
सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी रात्री झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी पंतप्रधानांनी सखोल चर्चा केली आणि जवानांच्या शौर्याला सलाम केला. पाकिस्तानकडून आदमपूर एअरबेस नष्ट केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र पंतप्रधान स्वतः येथे उपस्थित राहून त्या दाव्याला प्रत्यक्ष खोटं ठरवलं आहे.
मोदींनी आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिलं, “आज सकाळी आदमपूर एअर फोर्स स्टेशनला भेट दिली आणि आपल्या पराक्रमी हवाई जवानांशी संवाद साधला. त्यांच्या शौर्य आणि निष्ठेचा अनुभव घेणं हे खूपच प्रेरणादायी ठरलं. देशासाठी त्यांनी दाखवलेली निःस्वार्थ भावना आणि समर्पण अभिमानास्पद आहे.”
या भेटीदरम्यान, एअर चीफ मार्शल एपी सिंगही पंतप्रधानांसोबत उपस्थित होते. आदमपूर एअरबेस हे भारताच्या मिग-२९ लढाऊ विमानांचं महत्वाचं केंद्र मानलं जातं आणि युद्धजन्य परिस्थितीत शत्रूवर जलद कारवाईसाठी या तळाची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
ही अचानक झालेली भेट राजकीय आणि लष्करीदृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जात असून, पाकिस्तानकडून फैलवण्यात येणाऱ्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्याचा भारताचा निर्धार यामधून स्पष्टपणे दिसतो.










Comments are closed