India Morning News
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मत चोरीच्या मुद्द्यावर मोठे दावे केले आहेत. त्यांनी हरियाणा निवडणुकीचा उल्लेख करत सांगितले की, “हरियाणा आणि कर्नाटकमध्ये मतांची प्रणालीगत चोरी झाली आहे. आमच्याकडे यासंदर्भात ‘एच फाइल्स’ आहेत, ज्या या संपूर्ण गैरप्रकारावर प्रकाश टाकतात.”
राहुल गांधी म्हणाले की, हरियाणामधील अनेक उमेदवारांकडून काहीतरी बरोबर नाही, मतदान प्रक्रियेत गडबड होते आहे अशा तक्रारी आल्या होत्या. “सर्व एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीवर दाखवली गेली होती, पोस्टल बॅलेटमध्ये आम्ही ७३ जागांवर पुढे होतो. मात्र अंतिम निकालात आमचा पराभव केवळ २२,७७९ मतांनी झाला. हा निव्वळ योगायोग नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, “आम्ही पूर्वी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात अशा प्रकारचे अनुभव घेतले होते, परंतु यावेळी हरियाणातील परिस्थिती अधिक संशयास्पद होती. म्हणून आम्ही सखोल तपास करण्याचा निर्णय घेतला.”
राहुल गांधींनी गंभीर आरोप करत म्हटले की, “हरियाणात तब्बल २५.४१ दशलक्ष मते चोरीला गेली आहेत. दर आठ मतदारांपैकी एक मतदार खोटा आहे. बनावट फोटो असलेले १ लाख २४ हजार मतदार आहेत. हा प्रकार स्थानिक नाही, तर केंद्रीकृत स्तरावर राबविण्यात आला.”
त्यांनी उदाहरण देत सांगितले की, “हरियाणा मतदार याद्यांमध्ये एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो अनेक ठिकाणी वापरण्यात आला आहे. सीमा, स्वीटी, सरस्वती अशा वेगवेगळ्या नावांखाली तीच व्यक्ती दिसते. काही प्रकरणांत एका व्यक्तीने दोन वेगवेगळ्या बूथवर २२३ मते टाकल्याची माहिती आहे.”
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आली आहेत. हे फक्त बूथ लेव्हलवरील नाही तर पूर्ण राज्य पातळीवरील नियोजित कटकारस्थान आहे.”
त्यांनी दावा केला की, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये एकूण ५ लाख २१ हजार डुप्लिकेट मतदार ओळखले गेले आहेत. “ही फक्त निवडणूक नव्हे, तर लोकशाहीवरचा हल्ला आहे,” असे राहुल गांधींचे म्हणणे आहे.











