India Morning News
मुंबई :-
महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन समीकरणं आकार घेऊ लागली असतानाच गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घडामोड घडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये अचानक भेट झाली. जवळपास एक तास चाललेल्या या बैठकीचा तपशील मात्र पूर्णतः गुप्त ठेवण्यात आला आहे.
या अनपेक्षित भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजप आणि मनसे यांच्यात आगामी विधानसभा किंवा मुंबई महापालिकेसाठी आघाडी होणार का, यावरून तर्कवितर्क रंगले आहेत. युतीच्या शक्यतेनं विरोधकही सतर्क झाले असून, ही भेट पूर्वनियोजित होती की अचानक घडली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, यावरूनही सध्या चर्चेला उधाण आलं आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी नुकतीच दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली – “महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होणार”. याचा अर्थ अनेकांनी राज आणि उद्धव पुन्हा एकत्र येतील, असा काढला आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि फडणवीसांची बैठक ही एक महत्त्वाची राजकीय खूण मानली जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय समीकरणं तयार होण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे.







Comments are closed