India Morning News
मुंबई : मनसेने उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे युतीचा हात दिला असताना, या प्रस्तावाला उत्तर कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या यासंदर्भातील प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, तेच प्रत्यक्षात उतरेल. काही बाबी पाहिल्या जात आहेत, लवकरच केवळ इशारा नव्हे तर थेट बातमी मिळेल.”
त्यांच्या या सूचक विधानानंतर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये युती होणार का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत सकारात्मक भूमिका मांडली आहे.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “राज आणि उद्धव ठाकरे जर पुन्हा एकत्र येत असतील, तर मी नक्कीच याचे स्वागत करीन. कोणतेही दोन पक्ष जर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्र येत असतील, तर ते आनंददायी ठरेल.”
मविआत प्रवेशाबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या,जर राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होणार असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत का करू नये? लोकशाहीत प्रत्येक पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी कोणी पुढे येत असेल, तर तो निर्णय स्वागतार्ह आहे.”
तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षपूर्वक स्थापनेची आठवण करून देत सुळे म्हणाल्या, “बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पाया घातला गेला. दुर्दैवाने काही गोष्टी घडल्या, पण जर त्यांचे वारसदार पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काम करत असतील, तर हे निश्चितच गौरवाचे पाऊल ठरेल.”
या पार्श्वभूमीवर, मनसे आणि उद्धवसेनेची युती होणार की संपूर्ण महाविकास आघाडीतच राज ठाकरे सामील होणार, याची उत्सुकता आता सर्वत्र वाढली आहे.










Comments are closed