India Morning News
सातारा: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सातारा जिल्ह्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे आवश्यक भांडवली निधी अपुरा असल्याने आणि आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
RBI च्या आदेशानुसार, ७ ऑक्टोबर २०२५ पासून या बँकेला कोणताही बँकिंग व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच बँक नवीन ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा विद्यमान ठेवीदारांना रक्कम परत करू शकत नाही.
रिझर्व्ह बँकेने राज्य सहकार आयुक्तांना बँकेच्या लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू करून लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ठेवीदारांना जास्तीत जास्त ₹५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेव विमा आणि पत हमी महामंडळामार्फत (DICGC) मिळणार आहे.
RBI च्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत ९४.४१% ठेवी DICGC विम्याखाली होत्या. ठेवीदारांनी दिवाळीपूर्वी तरी काही रक्कम परत मिळावी, अशी मागणी केली आहे.
या निर्णयानंतर ठेवीदारांचे भविष्य आणि लिक्विडेशन प्रक्रिया कशी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











Comments are closed