India Morning News
मुंबई:-
मुंबईवर अदानी समूहाचे आक्रमण सुरू असून, दिल्लीतून व गुजरातमधून मराठी अस्मितेला पायदळी तुडवण्याचे षड्यंत्र आखले जात आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई ही १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवलेली आहे, ती फुकटात कोणाच्या घशात घालू दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मनसे-ठाकरे गट युतीवर सुस्पष्ट भूमिका-
मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, “राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी स्वतंत्र संघटना उभी केली. प्रकाश आंबेडकरसुद्धा आज याच मुद्द्यावर बोलत आहेत. हे सर्व आता एकत्र आले पाहिजेत. अन्यथा मुंबई आपल्या हातातून जाईल.
आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यास तयार-
“उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आम्ही सर्वजण मनसेसोबत युतीबाबत एका सुरात बोलतो आहोत. आमच्या भावना पारदर्शक व महाराष्ट्राच्या हितासाठी आहेत. महाराष्ट्रासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत,” असे स्पष्ट शब्दांत राऊतांनी सांगितले.
शिंदे गटावर पलटवार-
शिवसेना ठाकरे गटाचे पाच खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “अशा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रसारमाध्यमांना ही माहिती कोण देतंय, हेच महत्त्वाचं आहे. मी जर म्हणालो की, शिंदे गटाचे सहा खासदार भाजपाच्या संपर्कात आहेत, २२ आमदार अजित पवारांकडे जाणार आहेत – तर?”
मुंबईची विक्री थांबवा –
मदर डेअरीचा भूखंड गेला, अख्खी धारावी गेली, आता मुंबईही अदानींच्या घशात घालण्याचे डावपेच सुरू आहेत. हे आक्रमण थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे लागेल,” असा पुनरुच्चार करत राऊतांनी महाराष्ट्रवासीयांना एकजूट होण्याचे आवाहन केले.










Comments are closed