India Morning News
मुंबई:महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या महसूल खात्यात आमूलाग्र बदल घडवून नागरिकांचे जीवन सुलभ करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. जुन्या आणि गुंतागुंतीच्या कायद्यांना कायमचे निरोप देत जमिनीच्या मालकीचा प्रश्न स्पष्ट होईल आणि शासकीय सेवा जलद, पारदर्शी आणि थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचतील, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत महसूल खाते *“सेवा पखवाडा”* साजरा करत आहे. “प्रत्येक शासकीय सेवा साध्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे,” असे बावनकुळे यांनी नमूद केले.
*सेवा पखवाड्यात काय होणार?*
*गावातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवली जाणार: गावातील रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे काढून महाराष्ट्र हे गाव रस्ते अतिक्रमणमुक्त करणारे देशातील पहिले राज्य बनेल.
*जमिनीचे सर्वेक्षण आणि डिजिटल क्रमांक: प्रत्येक जमिनीच्या तुकड्याचे सर्वेक्षण करून त्याला नकाशावर डिजिटल क्रमांक दिला जाईल.
*शहरी कुटुंबांना मालमत्ता पत्रिका: सुमारे २५ लाख शहरी कुटुंबांना मालमत्ता पत्रिका दिल्या जातील.
*५० लाख कुटुंबांना लाभ: या मोहिमेद्वारे सुमारे ५० लाख कुटुंबांना शासकीय सेवांचा लाभ मिळेल.
*जुनाट कायदे रद्द: जुन्या आणि गुंतागुंतीच्या महसूल कायद्यांपैकी ९०% कायदे रद्द केले जाणार आहेत. उदाहरणार्थ, जमिनीच्या तुकडेबंदीचे नियम रद्द करून ४,५०० हून अधिक कुटुंबांना मालकी हक्क देण्यात आले आहेत.
*ऑनलाइन डॅशबोर्ड: जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या दैनंदिन कामावर लक्ष ठेवण्यासाठी नवीन ऑनलाइन डॅशबोर्ड सुरू होईल. यामुळे गती, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढेल.
महसूल खात्याच्या या सुधारणांमुळे नागरिकांना जलद आणि पारदर्शी सेवा मिळतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.










Comments are closed