India Morning News
मुंबई : महाडमधील स्टुरवाडी गावात चार हेलिपॅड्सच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल १३.९ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. या खर्चावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून, हा खर्च जनतेच्या कष्टाच्या पैशातून खासगी व्यक्तींसाठी केल्याचा आरोप केला आहे.
दमानिया म्हणाल्या, “तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना? मग त्यांनी स्वतः खर्च करून हेलिपॅड्स बांधावीत. हे हेलिपॅड्स खास वैयक्तिक भेटीसाठी आहेत. अमित शाह यांची ही भेट वैयक्तिक होती, तर त्याचा भार सरकारी तिजोरीवर का टाकला जातो?”
त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष्य केले. “सिंचन घोटाळा विसरून आजचे सरकार एका वेगळ्याच ताळमेळात दिसतेय. जनतेच्या पैशातून खास व्यक्तींसाठी सुविधा उभारणे म्हणजे सामान्य नागरिकांची थट्टा आहे,” असेही त्या म्हणाल्या.
या प्रकरणात महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ एप्रिल २०२५ रोजी निविदा जाहीर केली असून, १६ एप्रिल रोजी निविदा उघडण्याची प्रक्रिया पार पडली. इतक्या अल्प कालावधीत – केवळ तीन दिवसांत – काम पूर्ण करण्याची अट ठेवल्यामुळेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सध्या या प्रकरणावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी हाच मुद्दा उपस्थित केला आहे की, सरकारने गरिबांसाठी योजना राबवाव्यात, ना की सत्ताधाऱ्यांच्या भेटींसाठी सोन्याच्या ताटात भोजन आणि खास हेलिपॅड उभारावीत.










Comments are closed