India Morning News
पुणे: भोर मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
फडणवीसांचं दबावराजकारण ,विधानसभा अध्यक्षपद थोपटेंच्या हातून निसटलं-
सपकाळ म्हणाले, संग्राम थोपटेंना विधानसभा अध्यक्षपद मिळणार होतं, पण फडणवीसांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर दबाव टाकून ही निवडणूकच होऊ दिली नाही. हा प्रकार थोपटे कुटुंबाच्या स्वाभिमानाशी आणि काँग्रेसच्या हक्काशी गद्दारी करणारा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शिवसेना फोडल्यावरून सरकारवर टीका
शिवसेना फोडून सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजपवर सपकाळ यांनी टीका केली. संविधानाच्या मूल्यांना हरताळ फासला जातोय, महाराष्ट्रात लोकशाहीची गळचेपी सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मंगेशकर रुग्णालय प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील भ्रष्टाचारप्रकरणी ससून रुग्णालयाने दिलेल्या क्लीन चिटवरही सपकाळ नाराज आहेत. डॉ. घैसास यांनी रुग्णाकडून १० लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. यावर कारवाई करण्याऐवजी सरकार आरोपींना वाचवत आहे, अशी टीका करत त्यांनी रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळाच्या बरखास्तीची मागणी केली.
बीडमधील महिलेला अमानुष मारहाण – कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न
बीड जिल्ह्यातील महिलेला झालेली मारहाण आणि संतोष देशमुख हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, हे धक्कादायक आहे, असे सपकाळ म्हणाले.
ईव्हीएमवर संशय – सुप्रीम कोर्टाकडे हस्तक्षेपाची मागणी
ईव्हीएम संदर्भात वाढणाऱ्या शंका लक्षात घेता व्हीव्हीपॅट मोजणी आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हे प्रकरण गाजत आहे. सीबीआयमार्फत चौकशी आणि सर्वोच्च न्यायालयाने याची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.









Comments are closed