India Morning News
मुंबई: सामाजिक माध्यमांचा दुरुपयोग करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत, ईशान्य मुंबईतील महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी सायबर क्राइम विभाग तसेच परिमंडळ सहाच्या पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
“भाजपा येणार, मुंबई घडवणार” या फेसबुक अकाउंटवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय दिना पाटील यांचे फोटो वापरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात आला होता. या पोस्टला ‘ब्रेकिंग न्यूज’ असे शीर्षक देऊन लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कृत्यामुळे दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन जातीय दंगल घडवण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप खा. पाटील यांनी केला आहे. यासोबतच त्यांची बदनामी करण्याचा हेतूही या पोस्टमागे होता, असे त्यांनी नमूद केले.
पोलिसांकडे तक्रार, कठोर कारवाईची मागणी
वांद्रे येथील सायबर क्राइम विभाग आणि परिमंडळ सहाच्या पोलीस उपायुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारीदरम्यान शिवसेनेचे विभागप्रमुख सुरेश पाटील उपस्थित होते. खा. पाटील यांनी या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा कट आहे. अशा समाजकंटकांना वेळीच अटकाव घालणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

लोकसभेतील पराभवाचा राग?
खा. संजय पाटील यांनी या प्रकरणामागे राजकीय सूडबुध्दी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. “लोकसभा निवडणुकीतील पराभव काहींना सहन झालेला नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पण महाराष्ट्रातील सुज्ञ जनता अशा भूलथापांना बळी पडणार नाही,” असे त्यांनी ठणकावले. सामाजिक शांतता राखण्यासाठी आपण आणि पोलीस प्रशासन सतर्क असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
सामाजिक माध्यमांचा वाढता दुरुपयोग
सामाजिक माध्यमांचा वापर करून खोट्या बातम्या आणि आक्षेपार्ह मजकूर पसरवण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत. यापूर्वीही अनेकदा राजकीय हेतूने अशा पोस्ट्सद्वारे समाजात तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. यासंदर्भात सायबर क्राइम विभागाने यापूर्वीही अनेक प्रकरणांवर कारवाई केली आहे. खा. पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, लवकरच दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
पोलिसांचे आवाहन
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सामाजिक माध्यमांवरील कोणत्याही संशयास्पद मजकुराबाबत तात्काळ पोलिसांना कळवावे. तसेच, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्स शेअर करण्यापासून नागरिकांनी स्वतःला रोखावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.











Comments are closed