India Morning News
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट जाणवत असून, येत्या १४ जूनपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार आहे. मान्सूनचा प्रवेश उशीराने होणार असल्यामुळे अनेक भागांत तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पश्चिम किनारपट्टी वगळता विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांमध्ये प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नागपूरमध्ये तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ आदी जिल्ह्यांतील तापमानही ४० अंशांच्या वर गेलं आहे. ही परिस्थिती काही दिवस कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, काही भागांत ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आठवड्याच्या सुरुवातीला हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. या काळात पावसाचा अंदाज निश्चित नसल्याने बियाणे आणि श्रम वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिरता आणि योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना पुरेसे पाणी प्यावे, उन्हात बाहेर जाणे टाळावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असं सुचवलं आहे.









Comments are closed