India Morning News
तुमसर (भंडारा): शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारत स्वच्छता अभियानांतर्गत “स्वच्छ भारत – सुंदर भारत” या उपक्रमाचा भाग म्हणून स्वच्छता रॅली काढली. या रॅलीतून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व गाडगे महाराज यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. त्यांच्या विचारांचा संदर्भ देत “आपला परिसर स्वच्छ ठेवा”, “स्वच्छतेतच आरोग्य आहे” यांसारख्या घोषणांनी वातावरण दणाणून टाकले. नागरिकांनीही विद्यार्थ्यांचा उत्साह आणि संदेश कौतुकाने स्वीकारला.
रॅलीत आरएसपी पथक, स्काऊट पथक, हरित सेना व बँड पथक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातातील फलक, घोषवाक्ये व स्वच्छता गीतांच्या माध्यमातून आरोग्य आणि स्वच्छतेचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी प्राचार्य राहुल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “सुदृढ आरोग्य हीच जीवनाची खरी किल्ली आहे. स्वच्छतेची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासूनच केल्यास सुदृढ आणि विकसित भारत घडेल.”
कार्यक्रमात ज्योती बालपांडे, दीपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, विद्या मस्के, सारिका आठोडे, श्रेया उरकुडे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्साह, राष्ट्रीय एकात्मता आणि समाजजागृती या रॅलीतून प्रभावीपणे प्रकट झाली.






Comments are closed