India Morning News
उपशीर्षक – पोलिसांनी उचलला पुढाकार, झाले विवाहाचे साक्षीदार
गडचिरोली : दहशतीच्या छायेत आयुष्य घालवणाऱ्या आणि जंगलात लपून हिंसेचा मार्ग स्वीकारलेल्या १३ नक्षल युवक-युवतींनी अखेर समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नव्या जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात या सर्वांनी एकमेकांच्या साथीनं संसारवेली रुजवली.
हा आगळावेगळा विवाह सोहळा गडचिरोली पोलीस मुख्यालयात पार पडला. ‘शुभ मंगल सावधान’च्या मंत्रघोषात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नवदांपत्यांनी विवाहबंधनात प्रवेश केला. खास बाब म्हणजे या समारंभात पोलिसच वऱ्हाड बनून सहभागी झाले होते.
बंदुकीऐवजी सनई-चौघडे
पूर्वी बंदुकीच्या आधारावर जगणाऱ्या या तरुणांची बारात आज पोलीस बँडच्या वाद्यांच्या सुरात नाचत आली. पोलीस मुख्यालयातून वाजतगाजत वरात निघाली आणि शहीद पांडू अलाम सभागृहात हा स्मरणीय सोहळा पार पडला. नवविवाहित जोडप्यांनी आनंदाने या सोहळ्यात सहभाग घेतला, तर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं.
मुख्यमंत्र्यांचा स्नेहाशीर्वाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवदांपत्यांना त्यांच्या नव्या जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटलं, “हिंसेच्या मार्गावरून प्रेमाच्या आणि शांततेच्या वाटेवर पाऊल टाकणं ही खरी सामाजिक क्रांती आहे.” राज्य सरकारकडून या जोडप्यांना गृहपयोगी साहित्य आणि सरकारी योजनांची माहिती देण्यात आली.
‘मोस्ट वॉन्टेड’ ते समाजस्वीकार
या सोहळ्यात काही कधी काळी मोस्ट वॉन्टेड असलेल्या नक्षलवाद्यांचाही समावेश होता. त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामाजिक पुनर्वसनाची वाट स्वीकारली आहे. गडचिरोली पोलिसांच्या पुनर्वसन उपक्रमाने ही सकारात्मक परिवर्तनाची प्रक्रिया शक्य झाली.हा सामूहिक विवाह फक्त व्यक्तिगत आयुष्याचा नाही, तर समाजाच्या बदलाची सुरुवात ठरली. हा एक संदेश आहे — की बंदूक नव्हे तर संवाद, आत्मसमर्पण आणि विकासच आपल्याला नवजीवन देतो.
गडचिरोलीच्या मातीने आज इतिहास घडवला. ज्यांनी कधी काळी बंदुकीने उत्तरं शोधली, त्यांनी आता संसाराच्या मंगलमंत्रात शांततेचा मार्ग स्वीकारला. पोलीस दलाने केवळ सुरक्षा नाही, तर मानवी मूल्यांची जोपासना करून समाज परिवर्तनाची नवी दिशा दाखवली आहे.










Comments are closed