India Morning News
शासनाच्या गाळमुक्त धरण’च्या नावाखाली मुरमाची लूट !
तुमसर (२९ जून, भंडारा) : राज्यशासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या नावाखाली तुमसर तालुक्यातील खापा-परसवाडा शिवारात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे गाळ काढण्याच्या नावाखाली चक्क मुरूम उत्खनन सुरू असून नैसर्गिक संपत्तीची बिनधास्त लूट होत आहे. यामुळे तलावांचे अस्तित्व व पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे.
तलाव पुनरुज्जीवनाच्या योजनेत गाळ काढून पाणी साठवणक्षमता वाढविणे अपेक्षित आहे. मात्र खापा-परसवाडा तलावात जेसीबी लावून सर्रास मुरूम काढला जात आहे. हा मुरूम शासकीय व खासगी बांधकामांसाठी विकला जात असल्याची माहिती आहे. हे सर्व ‘गाळ उपसा’च्या नावाखाली सुरू आहे. या योजनेचा उद्देश जलसाठा वाढविणे आणि शेतकऱ्यांना गाळ पुरविणे हा होता. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानही जमा होते. परंतु स्थानिक शेतकऱ्यांना या योजनेविषयी माहितीच नाही. गाळाच्या नावाखाली मुरूम उपसला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे उत्खनन दिवसाढवळ्या सुरू असतानाही महसूल व लघुपाटबंधारे विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. या प्रकाराबाबत स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन गाळ की मुरूम, याची प्रत्यक्ष पाहणी करावी, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित मेश्राम यांनी केली आहे. अन्यथा ही योजना केवळ कागदावरच राहील आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट चालूच राहील, अशी भीती व्यक्त होत आहे.
तलावाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह…
खापा-परसवाडा येथील हा तलाव लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असून त्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांचीच आहे. परंतु तलावाच्या काठावर मोठे खड्डे पडले असून खोल उत्खननामुळे तलावाची मूळ रचना बदलली जात आहे. ज्यामुळे त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुरूम उपशामुळे भविष्यात पाणी साठवणक्षमता घटून जलस्तर खाली जाण्याची शक्यता आहे. खोदकामांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.








Comments are closed