India Morning News
मुंबई : काश्मीरमधील भीषण हल्ल्यानंतर देशभरात शोककळा पसरली असताना, महाराष्ट्रात मात्र सरकारमधील घटक पक्षांत श्रेय घेण्याच्या चढाओढीमुळे वादाची नवी मालिका सुरू झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारच्या अंतर्गत गोंधळावर थेट टीका केली आहे.
राऊत म्हणाले की, अशा काळात सरकार एकसंघपणे निर्णय घेतो आणि एकच प्रतिनिधी काम पाहतो, हे अपेक्षित असताना गिरीश महाजन यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तत्काळ काश्मीरला पोहोचल्यामुळे “सरकार एक आहे की दोन? असा प्रश्न उपस्थित होतो.
हे पॅरलल गव्हर्नमेंट आहे का? असा थेट सवाल करत त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच सरकारचे भाग असून एकत्र काम करणं ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. राऊतांच्या मते, अशा दु:खद प्रसंगात राजकीय श्रेयासाठी धावपळ करणं हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे.
संकटकाळी एकत्र उभं राहणं महत्त्वाचं-
राऊतांनी स्पष्ट केलं की, सर्व विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी उभे आहेत. “या कठीण काळात आम्ही एकजूट दाखवण्याची गरज आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे,” असं त्यांनी सांगितलं.
सर्वपक्षीय बैठकीबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेत, “अशा चर्चांमध्ये प्रत्येक पक्षाला बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. सूचनांचं पालन झालं, तरच बैठकीला अर्थ आहे,” असंही ते म्हणाले.
काश्मीर विषयावर विशेष अधिवेशनाची मागणी-
काश्मीरमधील घटनांवर अधिक सखोल चर्चा व्हावी यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन घेण्याची सूचना संजय राऊतांनी केली आहे. “राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर सर्वपक्षांना एकत्र बोलण्याची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले.
शोकाच्या क्षणीही राजकीय कुरघोडी सुरू असणं अत्यंत खेदजनक असल्याचं सांगत, राऊतांनी सरकारला अधिक जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला आहे.









Comments are closed